ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंढरपूरातील विठ्ठल मंदीर हे देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच पंढरपुरात स्थानिकांवर कॉरिडॉर लादण्याचे काम सरकार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामार्फत करत आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे फडणवीस यांनी या प्रकरणात आव्हाने देऊ नये, अन्यथा ते उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत, असा इशारा भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी दिला.
सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंढरपुरात कॉरिडॉर ऐवजी येथे पायाभूत सुविधांचा विकास सरकारने आधी केला पाहिजे. पंढरपुरात विमानतळ होणे गरजेचे आहे. कारण देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. येथील चंद्रभागा नदी अतिशय प्रदुषित झाली आहे. तिची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत देवेंद्र फडणवीस स्थानिकांवर कॉरिडॉर लादत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा कॉरिडॉर होऊ देणार नाही.
अधिक वाचा : चीन, जपानसह 5 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य
या सरकारने अहंकारात काहीही करू नये, स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.