ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं हे सेना ठरवेल असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 35 आमदार नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याआधीही महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले. शिवाय, त्यांनी सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचाचा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यात सुरु असलेल्या प्रकारावरून विरोधीपक्ष भाजपावर निशाणा साधला.
“याआधीही सत्ता बदलाचाप्रयत्न झाला आहे. आता सत्तांतराचा हा तिसरा प्रयत्न आहे. भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. पण त्याला यश आले नाही. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. अडीच वर्षे सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आहे. राजकीय पेचातून मार्ग निघेल सरकार कोसळणार नाही असा मला विश्वास आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही”, असे त्यांनी म्हटले
हेही वाचा : ‘हे’ १९ आमदार आहेत नॉट रिचेबल
मुख्यमंत्री कोणाला करायचं हे सेना ठरवेल
पुढे पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय अशी मागणी असल्याचं सांगत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं ते बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजतंय,” असं सांगितलं. पुढे बोलताना शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं सांगितलं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री कुणाला करायचं हा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा आहे. सेना ज्याला मुख्यमंत्री करेल ते आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : भाजपसोबत युती करा, तरच बंड मागे? शिवसेनेतील फुटीरवाद्यांची मागणी